मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई, ठाणे, पुण्यासह एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा आज होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेची जवळपास सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, आज दुपारी 4 वाजता आयोगाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांच्या तारखा, मतदानाचा कालावधी तसेच निकाल जाहीर होण्याची संभाव्य तारीख याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आचारसंहिता तात्काळ लागू होईल. त्यामुळे संबंधित महापालिका क्षेत्रांमध्ये नवीन घोषणा, निर्णय आणि विकासकामांवर निर्बंध येणार आहेत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासन आणि राजकीय पक्षांची हालचाल वाढणार असून, निवडणूक प्रचाराला वेग येईल. राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून, आगामी महापालिका निवडणुका अत्यंत चुरशीच्या ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची चिन्हे आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आज सायंकाळी चार वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये महानगरपालिका निवडणुकांबाबत अधिकृत घोषणा होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कालच राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले असून, त्यानंतर लगेचच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलावल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे आजच महापालिका निवडणुकांची घोषणा होऊन राज्यभर आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आयोगाच्या पत्रकार परिषदेतील निर्णयांवर पुढील राजकीय घडामोडींची दिशा निश्चित होणार असल्याने सर्वच पक्ष, संभाव्य उमेदवार आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याचे चित्र आहे.
या निवडणूक प्रक्रियेत राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांचा समावेश आहे. यामध्ये अहिल्यानगर, अकोला, अमरावती, भिवंडी-निजामपूर, बृहन्मुंबई, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, इचलकरंजी, जळगाव, जालना, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, लातूर, मालेगाव, मीरा-भाईंदर, नागपूर, नांदेड-वाघाळा, नाशिक, नवी मुंबई, पनवेल, परभणी, पिंपरी-चिंचवड, पुणे, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर आणि वसई-विरार या महानगरपालिकांचा समावेश आहे. या सर्व महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या, आर्थिक उलाढाल आणि राजकीय महत्त्व असल्यामुळे या निवडणुकांकडे राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. अनेक शहरांमध्ये सत्ता कोणाच्या हाती जाणार, यावर भविष्यातील राजकीय समीकरणे ठरण्याची शक्यता आहे.



