धरणगाव : प्रतिनिधी
शहरातील सत्यनारायण चौक येथे मंगळवारी रात्री झालेल्या हल्ल्यात एका युवकावर चाकूने प्राणघातक वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून धरणगाव पोलिसात तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सत्यनारायण चौक येथील रहिवासी भूषण सुरेश भागवत (वय ३४) हे रात्री ११ वाजेच्या सुमारास आपल्या इको गाडी जवळ उभे असताना साई अतुल कासार, तुषार ऊर्फ मुन्ना परेश नेरपगार आणि क्रिश महेश राठोड हे तिघे मद्यधुंद अवस्थेत तेथे आले. यापूर्वी पेट्रोल चोरीच्या वादातून झालेल्या रागातून साई कासार याने भूषण भागवत यांच्या कानाखाली चापट मारून खिश्यातील चाकू काढून त्यांच्या खांद्याजवळ व कपाळावर वार केले.
दरम्यान, तुषार नेरपगार व क्रिश राठोड यांनीही लाथाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. या हल्ल्यात भागवत गंभीर जखमी झाले असून त्यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. या घटनेनंतर भूषण भागवत यांनी धरणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी साई कासार, तुषार नेरपगार व क्रिश राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.


