पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकार मधील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक मोठी घोषणा केली आहे. मागच्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजनुसार शेतकऱ्यांना संपूर्ण मदत दिली जाईल. मदत कशा प्रकारे दिली गेली आहे, याची सविस्तर माहिती ही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर स्पष्ट होईल. दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासंदर्भात वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विरोधी पक्ष याबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेज हे आजवरचे सर्वात मोठे पॅकेज आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर त्यातून ते स्पष्ट होईल. केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्यातील या संकटात केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली आहे. अतिवृष्टीसंदर्भातील अहवाल लवकरच पूर्ण होणार असून, अंतिम अहवाल केंद्र सरकारला पाठविला जाणार आहे. त्यानुसार केंद्र सरकार मदत करणार असल्याचे शहा यांनी सांगितले आहे.
या अहवालात पिकांचे झालेले नुकसान, जनावरे, तसेच जीवितहानी, रस्ते, पूल, विहिरी यांचे झालेले नुकसान याचा एकत्रित ताळेबंद दिला जाणार आहे. अहवाल परिपूर्ण झाल्यानंतरच केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर केंद्र सरकारचे पथक पाहणी करेल व त्याचा अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारची मदत राज्याला मिळेल, असेही पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या 31 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजपैकी केवळ साडेसहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यावर विरोधी पक्षदेखील राज्य सरकारवर टीका करत आहे. याबाबत विचारले असता पवार यांनी विरोधी पक्षांचे ते कामच असल्याचे सांगत राज्य सरकार करत असलेल्या चांगल्या कामाबद्दल ते कधीही चांगले बोलणार नाहीत, अशी टीका
पवार म्हणाले, यासंदर्भात मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता यांना ही मदत कुठल्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.


