पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार दौऱ्यावर असल्याने अनेक मोठे विधान विधान केल्याने अजित पवार चर्चेत आले होते आता देखील एक महत्वाचे विधान केले आहे. सोन्याचे दागिने स्त्रियांनाच शोभून दिसतात, पुरुषांनी त्या भानगडीत पडू नये. सोन्याच्या जाडजूड चेन घालणारे पुरुष गळ्यात साखळी घातलेल्या बैलांसारखे दिसतात, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोल्डमॅन म्हणून मिरवणाऱ्या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी चिमटा काढला. चाकण येथील एका ज्वेलर्स शोरूम उद्घाटनावेळी ते बोलत होते.
अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेकवेळा त्यांनी परखड वक्तव्य करत कानटोचणी केल्याचा याआधीही पाहायला मिळाले आहे. अशातच चाकण येथील एका ज्वेलर्सच्या उद्घाटनप्रसंगी बोलत असताना सोने घालून मिरवणाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या मारल्या.
सोन्याचे वेड हे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असते. सुरुवातीपासूनच ही परंपरा चालत आलीये. पण आधुनिक काळात जीवनशैली बदलली आणि लोक मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत आहेत. अडीअडचणीला सोने बँकेत गहाण ठेवून नड भागवता येते. पण आपल्याकडे काही लोकांची गोल्डमॅन म्हणूनही ओळख आहे. काहींनी सोन्याचे कपडेही शिवले. हे मात्र जरा अती होत असल्याचे अजित पवार म्हणाले.
पुरुष मंडळींना मी एवढंच सांगेन की सोने हे आई, पत्नी, बहीण आणि मुलींच्या अंगावरच शोभून दिसते. पुरुषांच्या अंगावर शोभून दिसत नाही. त्यामुळे पुरुषांनी सोन्याच्या भानगडीत पडू नका, तुम्ही सोने घातले तर बैलाच्या गळ्यात साखळी घातल्यासारखे दिसते ते. उगाचच बैलाला आपण गळ्यात साखळी घालतो, तशा प्रकारच्या सोन्याच्या साखळ्या घालून अनेकजण समोर येतात. अर्थात सोने ते त्यांच्या पैशाने घालत असले, तरी पण सोन्याकडे आपण स्त्रीधन म्हणून पाहतो आणि ते त्यांनाच दिले तर चांगले होईल, अशीही टिप्पणी अजित पवार यांनी केली.
दरम्यान, अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील पूरस्थितीबाबत भाष्य केले. सर्व मंत्र्यांनी दौरे केले आहेत. शेतकऱ्यांचा रोष, नाराजी, राग, विरोध पाहायला मिळाला. जेव्हा घरदार उध्वस्त होते, शेतीचं प्रचंड नुकसान होते, जमीन वाहून जाते, तेव्हा साहजिक अशा प्रतिक्रिया उमटतात. पण आम्ही या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, त्या अनुषंगाने निर्णय घ्यायचे ठरवले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीचा दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना झालेल्या नुकसानीची माहिती दिली असून, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी केल्याची माहिती अजित पवारांनी दिली. यासाठी विविध विभागांची मदत लागणार आहे. सरकार याबाबत उद्याच्या बैठकीत निर्णय घेईल. दिवाळीपर्यंत बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्याचे नियोजन आहे. आत्ता तातडीची 5000 रुपये, अन्न-धान्य, कपडे, निवारा अशी मदत केली जात आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.


