जळगाव : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून किरकोळ कारणावरून आपापसामध्ये सुरू असलेल्या धुसफुशीचे पर्यवसान दगडफेकीत होऊन दोन जण जखमी झाले. या घटनेने रामेश्वर कॉलनी परिसरातील स्वामी समर्थ केंद्र चौकात रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना मंगळवारी (२२ जुलै) रात्री नऊ वाजता घडली.
सविस्तर वृत्त असे कि, रामेश्वर कॉलनीत एका मेडिकलवर असलेल्या तरुणाला कामावरून कमी केल्याने गेल्या काही दिवसांपासून दोन गटांत धुसफुस सुरू होती. मंगळवारी रात्री परिसरातील काही तरुण एका अपार्टमेंटजवळ उभे होते. यावेळी दहा ते बारा जणांचे टोळके दुचाकीवरून आले. त्यांनी तेथे उभ्या असलेल्या तरुणांवर अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात सागर पाटील आणि मनोज निंबाळकर हे जखमी झाले. दगडफेकीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होऊन पळापळ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.