रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील सावदा येथे जडीबुटी विक्रीसाठी आलेल्या हरयाणातील दोन वैदूंना मुले चोरणारे असल्याचे समजून रविवारी दुपारी बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली. या घटना मुंजलवाडी, कुसुंबा आणि लोहारा (ता. रावेर) या तीन ठिकाणी घडल्या. पोलिस वेळीच पोहोचल्याने पालघर घटनेची पुनरावृत्ती टळली आहे. या प्रकरणी सावदा पोलिसांत परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जस्सानाथ पुनुनाथ (वय ६०) आणि मोनुनाथ जस्सानाथ (२०, दोघे रा. सिरसा हरयाणा) अशी या जखमी वैदूंची नावे आहेत. त्यांच्यावर सावदा रुग्णालयात उपचार करण्यात आले. आणखी मारहाणीचे प्रकार घडू नयेत, यासाठी त्यांना सावदा पोलिस ठाण्यात थांबवण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, या दोघांनी रविवारी सकाळी रावेर तालुक्यातील मुंजलवाडी गावात एका व्यक्तीची नाडीतपासणी केली. काही वेळात तो व्यक्ती इतर लोकांना घेऊन आला. त्यावेळी काहीजणांना हे वैदू मुले पळवणाऱ्या टोळीतील असल्याचा संशय आल्याने लोकांनी या दोन्ही साधूना मारहाण करायला सुरुवात केली. याबाबत सावदा पोलिसांत परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. लोहारा (ता. रावेर) येथील इकबाल तडवी या तरुणाच्या फिर्यादीवरून दोन्ही वैदूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे; तर जस्सानाथ पुनुनाथ यांच्या फिर्यादीवरून ३० ते ४० अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाण होताच त्या दोघांनी त्यांच्या चारचाकी वाहनातून (एमएच १३ ई -६५१६) पळ काढला. ते मंजुलवाडी येथून कुसुंब्याकडे पळाले; पण तिथेही स्थानिक रहिवाशांनी त्यांना अडवून मारहाण केली. या मारहाणीत स्वतःला वाचवत ते लोहारा गावाकडे निघाले. तिकडे जात असताना त्यांच्या कारचा धक्का लागल्याने एकजण जखमी झाला. इथेही लोहारा येथील नागरिकांनी या दोघांना पकडून मारहाण केली, तसेच त्यांच्या कारची तोडफोड केली. पोलिस लोहारा येथे घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला