मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या विधिमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये काल हाणामारी झाली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड रात्री दोन वाजेपर्यंत विधिमंडळ परिसरात थांबून आंदोलनाच्या भूमिकेत होते. त्याच दरम्यान विधानभवनाच्या मागच्या गेटने आव्हाड यांचा समर्थक नितीन देशमुख याला पोलिस घेऊन जात असताना आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची काडी अडवली. पोलिसांच्या गाडीच्या समोरच आंदोलन करत आव्हाड थेट गाडीच्या खाली घुसले होते. त्यामुळे काल मध्यरात्री विधिमंडळ परिसरात चांगलाच गोंधळ उडाला.
पोलिसांच्या वतीने मार खाणाऱ्याला अटक केली जात असून त्याला मारहाण करणारे पाच जणांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला. या प्रकरणातील गोपीचंद पडळकर यांच्या समर्थक असलेल्या पाचही आरोपींना पोलिस वडापाव आणि तंबाखू मळून देत असल्याचा आरोप देखील आव्हाड यांनी केला आहे. या सर्व गोंधळाचे चित्रीकरण कॅमेऱ्यात कैद झाले असून या प्रकरणाचे आता राजकीय पडसाद उमटत आहेत. एकूणच विधान भवनाच्या परिसरामध्ये दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी मध्ये झालेली तुंबळ हाणामारी आणि शिविगाळ यामुळे राज्याच्या राजकारणाचा दर्जा आता किती ढासळला? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
विधान भवन परिसरात झालेल्या हाणामारीनंतर पोलिसांनी बाळाचा वापर करत धरपकड सुरू केली. मात्र, आव्हाड यांनी थेट पोलिसांच्या गाडी समोर ठिय्या आंदोलन करत गाडी रोखून धरली. पोलिसांना आव्हाड यांना फरफटत बाहेर काढावे लागले. त्यानंतर पोलिसांनी मोठा फौजफाटा बोलावून सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत यावेळी आमदार रोहित पवार हे देखील नंतर हजर झाले होते.