जळगाव : प्रतिनिधी
गतिरोधकावर दुचाकी उधळल्याने सागर रामचंद्र सूर्यवंशी (वय ३२, रा. रावळगाव, ता. मालेगाव) हे दुचाकीस्वार खाली पडून डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (१५ जुलै) रात्री प्रेम नगरातील महाराणा प्रताप हायस्कूलजवळ घडली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सूर्यवंशी हे कामानिमित्त सासरी आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील दशरथ नगरात सागर सूर्यवंशी यांचे सासर आहे. ते सोमवारी (१४ जुलै) कामानिमित्त दुचाकीने सासरी आलेले होते. मंगळवारी (१५ जुलै) रात्री ते दुचाकीने प्रेम नगरातील महाराणा प्रताप हायस्कूल जवळून जात असताना गतिरोधकावर त्यांची दुचाकी आदळली गेली. त्यात ते खाली पडले व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. बुधवारी (१६ जुलै) सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.