जळगाव : प्रतिनिधी
शहरातील विद्यानगरात दि. ७ जुलै रोजी दुपारी छताला लावलेल्या दोरीचा गळफास लागून १२ वर्षीय हार्दिक प्रदीपकुमार अहिरे या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने अहिरे कुटुंबावर शोककळा पसरली असून, रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, विद्यानगरातील रहिवासी प्रदीपकुमार अहिरे हे पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. रावेर तालुक्यातील केऱ्हाडे येथील एका माध्यमिक शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. २०१५ मध्ये प्रदीपकुमार आणि त्यांच्या पत्नीने पुणे येथील एका संस्थेतून हार्दिकला ९ महिन्याचा असतांना दत्तक घेतले होते. हार्दिक त्यांच्या जीवनातील आनंदाचा स्रोत बनला होता.
सोमवारी दुपारी ३ वाजता हार्दिक शाळेतून घरी आला. चहा-बिस्किटे खाल्ल्यानंतर त्याची आई लहान भाऊ प्रसादला ट्यूशनला सोडण्यासाठी बाहेर गेली होती. यावेळी हार्दिक एकटाच शेजारी राहणारे पदमसिंह राजपूत यांच्या घरी खेळायला गेला. दुर्दैवाने, तिथे खेळत असताना छताला लावलेल्या दोरीचा फास अचानक त्याच्या गळ्याभोवती आवळला गेला. त्यावेळी घरात कोणीही नव्हते. काही वेळाने, परदेशी यांच्या घरात राहणाऱ्या एका महिलेच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तात्काळ आरडाओरड केली. घटनेची माहिती मिळताच हार्दिकच्या आईने आक्रोश केला. त्याला तातडीने खाजगी वाहनाने जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती हार्दिकला मृत घोषित केले. या घटनेने उपस्थित नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. खेळता खेळता एका निष्पाप चिमुकल्याचा असा करुण अंत झाल्याने विद्यानगर परिसरात शोककळा पसरली आहे.


