जळगाव : प्रतिनिधी
रामेश्वर कॉलनी येथे सोमवारी सकाळी ११:३० वाजता एक हृदयद्रावक घटना घडली. अकरावीत प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, १७ वर्षीय खुशी चैत्राम जाधव या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने जाधव कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खुशीचा भाऊ मयूर जाधव तिच्या अकरावीच्या प्रवेशासाठी महाविद्यालयात गेला होता. त्यावेळी घरात कोणीही नव्हते. मयूर घरी परतल्यानंतर त्याला खुशी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.
हा धक्कादायक प्रकार पाहून त्याने हंबरडा फोडला. त्याच्या आवाजाने शेजारी धावून आले आणि त्यांनी तत्काळ खुशीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.
खुशीची आई रंजनाबाई या शहरातील एका रुग्णालयात कामाला आहेत, तर वडील चैत्राम जाधव एमआयडीसीमधील एका कंपनीत कार्यरत आहेत. भाऊ मयूरदेखील एका कंपनीत कामाला आहे. खुशीने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


