मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख सरकारने हिंदीची सक्ती रद्द केल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद झाल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रातील गावागावात व कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्रचा नारा बुलंद झाला आहे. सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला नसता तर 5 जुलैच्या मोर्चात सत्ताधारी पक्षाचे अनेक नेते पक्षभेद विसरून सहभागी झाले असते, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी महायुती सरकारने शिक्षण विषयात अर्थतज्ज्ञांची समिती नियुक्त केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
उद्धव ठाकरे आज विधानभवनात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावात व कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्राचा नारा पुन्हा एकदा बुलंद झाला आहे. हा नारा बुलंद करण्यात शिवसेना व शिवसैनिक आघाडीवर होतेच, पण शिवसेनेसोबत ज्या ज्या राजकीय पक्षांनी ज्या ज्या मराठी भाषकांनी आपापले पक्षभेद विसरून सहभाग घेतला त्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो. सरकारला शहाणपण सुचले काी नाही हे येत्या काही दिवसांत कळेल. पण तूर्त त्यांनी हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. त्यांनी हा जीआर रद्द केला नसता तर 5 तारखेच्या मोर्चात सत्ताधारी भाजप, एसंशिं गट व अजित पवार गटाचे अनेक नेते सहभागी झाले असते. कारण आता मराठी माणसांची एकजूट आता झालेली आहे. त्यांनाही मी धन्यवाद देतो.
उद्धव ठाकरे म्हणाले, मातृभाषेचे प्रेम हे पक्षाच्या पलिकडे असले पाहिजे. सरकारने केवीलवाणा प्रयत्न केला. पण तरीही आम्ही त्यांना धन्यवाद देतो. आता त्यांनी एक नवीन समिती नेमली आहे. त्या समितीत नरेंद्र जाधव यांचा पांडित्याचा किंवा बुद्धीमत्तेचा पूर्ण आदर राखून मी त्यांना अर्थात सरकारला सांगतो की, तुम्ही अशी थट्टा करू नका. कारण, हा शिक्षणाचा विषय आहे आणि शिक्षण विषयात तुम्ही अर्थतज्ज्ञांची समिती नेमली आहे. अर्थात कालच मी सांगितले की, समिती कोणतीही असू द्या, त्यांनी काहीही सांगू द्या, पण सक्ती विषय हा संपलेला आहे.
त्यामुळे सरकारने कुणाचीही समिती बसवली, तरी आमच्यावर महाराष्ट्रावर हिंदी सक्ती होऊ शकत नाही हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिले आहे. म्हणून मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. 5 तारखेला विजय मेळावा किंवा विजयी मोर्चा होईल. तो कुठे व कसा करायचा याचा तपशील 2 दिवसांत दिला जाईल. आम्ही या प्रकरणी सर्वांशी संवाद साधणार आहोत, असे ते म्हणाले.
आपण विखुरले आहोत असे वाटल्यानंतर मराठीद्रोही पुन्हा डोके वर काढतात. त्यांचे डोके काल आपण चेपलेले आहे. चिरडून टाकले आहे. त्यांचा फना पुन्हा वर येऊ नये असे वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा ही एकजूट आपण कायम ठेवली पाहिजे. या एकजुटीचे दर्शन 5 तारखेला घडवल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, 5 जुलै रोजी विजयोत्सव साजरा केला जाईल. आम्ही सर्वांशी संवाद साधत आहोत. ज्याप्रमाणे आंदोलनात आमच्यासह सर्वजण एकत्र उतरले होते. तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवात दाखवण्याची गरज आहे. या सरकारने सुरूवातीला मराठी – अमराठी करत मराठी भाषिकांत फूट पाडण्याचा डाव रचला होता. मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची आणि त्यानंतर त्याचा फायदा घ्यायचा. पण मराठी भाषिकांत फूट पडत नसल्याचे दिसताच त्यांनी मराठी माणूस एकत्र येऊ म्हणून त्यांनी हा जीआर रद्द केला आहे.