यावल : प्रतिनिधी
शहरातील बुरूज चौकाजवळ शुक्रवारी कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिला ही गंभीर जखमी झाली होती. या महिलेचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. अंकलेश्वर बऱ्हाणपूर या राज्य मार्गाच्या कडेला भरत असलेल्या बाजार तसेच रस्त्यात विविध व्यवसाय करणाऱ्या हातगाडी धारकांमुळे रहदारीस अडथडा निर्माण होवून हा अपघात घडल्याने शहरातून संताप व्यक्त होत आहे. तर या पुढे प्रत्येक बाजाराच्या दिवशी हातगाडीसह रस्त्यात दुकान लावणाऱ्यांवर यावल पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, यावल शहरातून अंकलेश्वर बहऱ्हाणपूर राज्य मार्गस्थ होतो. या राज्य मार्गाच्या कडेला शुक्रवारचा आठवडे बाजार भरतो. रस्त्याच्या कडेला व्यवसायिकांच्या दुकाना तर रस्त्यावर हातगाडीवाले यामुळे रहदारीस प्रचंड अडचण निर्माण होत कोंडी होते. यातूनचे शुक्रवारी सायंकाळी आठवडे बाजारात बुरुज चौकात कस्तुरबा चैत्राम सावकारे (वय ५८, रा. चुंचाळे) या महिला बाजारात जात असताना या महिलेला कंटेनर क्रमांक आर. जे. ०९ जी. डी. ४९७० वरील चालक आबिद खान नवाब खान याने धडक दिली. या धडके महिलेच्या डाव्या पायावरूनच थेट कंटेनरचे चाक गेले आणि महिलेचा पूर्ण एक पायच निकामी होऊन महिला गंभीर जखमी झाली. तर या महिलेचा मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. तेव्हा याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आठवडे बाजाराच्या अतिक्रमण मुळेचं महिलेचा बळी गेला म्हणून शहरातून संताप व्यक्त केला जात आहे. मयत महिलेवर शोकाकुल वातावरणात चुंचाळे गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.