मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयावरून वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सरकारला हा निर्णय मागे घेण्यास वेळोवेळी सांगितलेही होते. मात्र त्यावर तोडगा निघत नसल्याने आता ठाकरे बंधूंचा हिंदी सक्तीविरोधात एकत्र मोर्चा निघणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या मोर्चात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “हा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही, तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे. भाषा, शिक्षण हा एक असा मुद्दा आहे, जो खूप गांभीर्याने घेतला पाहिजे. आपण तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जायला पाहिजे. इतर कोणतेही राज्य अशाप्रकारे काम करत नाही. महाराष्ट्र इतका आग्रही पवित्रा का घेत आहे? हे मला समजत नाही. आपण एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू शकत नाही.”
यावेळी सुप्रिया सुळे यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मोर्चात सहभागी होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सुप्रिया सुळेंनी आम्ही या मोर्चात पूर्ण ताकदीने सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे, जयंत पाटील यांनी देखील हिंदीसक्ती विरोधातील ठाकरेंच्या मोर्चाला शरद पवार गटाचा जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले आहे.
‘राज्य सरकार महाराष्ट्रात जी हिंदी सक्ती लादू इच्छित आहे त्याविरोधात दिनांक ५ जुलै २०२५ रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. प्रत्येक मराठी माणसाने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मी करत आहे. कुणाचाही विविध भाषा शिकण्याला किंबहुना हिंदी भाषेलाही विरोध नाही. पण इयत्ता पहिलीपासूनचं प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावं असा आग्रह आहे. जो योग्य आहे आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्ष म्हणून आमचीही हीच भूमिका आहे.
शैक्षणिक धोरणाच्या त्रिभाषा सूत्राआडून मातृभाषेला डावलण्यासाठी प्रयत्न होत असतील तर मराठी माणूस एकदिलाने त्याचा विरोध करणार. महाराष्ट्र हिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचं स्पष्ट धोरण आहे,’ असे सोशल मीडियावर पोस्ट करत जयंत पाटील यांनी सांगितले आहे.