धरणगाव : प्रतिनिधी
येथील श्रीराम मंदिरासमोरील घरात मुलीकडे काही दिवस राहण्यासाठी आलेल्या लीलाबाई विसपुते (७३, रा. जळगाव) यांच्यावर नातवानेच हल्ला केल्याची बाब समोर आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, गुरुवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यांच्यावर कुन्हाडीने वार करण्यात आले होते. त्या रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत आढळून आल्या होत्या. त्यांना जळगाव येथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब घोलप आणि पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी सुमारे दोन तास चौकशी केली. लीलाबाई विसपुते या धरणगाव येथे त्याची मुलगी वैशाली पोतदार यांच्याकडे काही दिवस राहण्यासाठी आल्या होत्या. दि. २६ रोजी सकाळी त्यांचा लहान नातू तेजस विलास पोतदार याच्याशी वाद झाला होता.
लीलाबाई यांनी तेजस याला सांगितले की, ‘शेअर मार्केटसाठी तू लोकांकडून पैसे घेतो, हे योग्य नाही.’ यावरून वाद झाला. त्यानंतर दुपारी दोन वाजता तेजस हा हातात कुन्हाड घेऊन खोलीकडे जात असल्याचे मोठा भाऊ अक्षय याने पाहिले होते. त्यावेळी ही कुऱ्हाड झाड तोडण्यासाठी आणल्याचे तेजसने सांगितले. मात्र, दुपारी ३:१५ वाजेच्या सुमारास तेजसनेच अक्षयला आजीवर हल्ला झाल्याची माहिती दिली. सकाळी झालेल्या वादातून हा प्रकार घडला. त्यामुळे लीलाबाई रघुनाथ विसपुते यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून तेजस विलास पोतदार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी उमेद धीरेंद्र विसपुते (रा. महाबळ कॉलनी) यांनी फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहेत.