मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी सोशल मीडियावर सरकारविरोधात पोस्ट करणाऱ्या तरुणांना उद्देशून वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं. त्यांनी केलेल्या विधानाचा सर्वच पातळ्यांवरून निषेध केला जात आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी आपल्या शैलीत बबनराव लोणीकर यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत.
आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला आहे. ‘जर बबन लोणीकर म्हणत असतील की त्यांचा जन्म मोदींमुळे झाला, सगळ्या गोष्टी मोदींमुळे मिळतात, तर हा थेट जनतेने निवडून दिलेल्या सरकारचा आणि लोकशाहीचा अपमान आहे’, असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तसेच, पहलगाममध्ये आमच्या माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी यावेळेस पहलगाम हल्ल्यात ट्रम्प यांनी घेतलेल्या मध्यस्थीबाबतही हल्लबोल केला. ‘ट्रम्प यांच्या एका विधानामुळे भारताला माघार घ्यावी लागली, तेही मोदींमुळेच घडलं. मुंबईतील मोक्याचे भूखंड अदानी समूहाला देण्यात आले, मराठी माणसाच्या घशातून काढून घेतलं, तेही मोदींमुळेच’, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
विविध मागण्यांसाठी शेतकरीवर्ग सध्या रस्त्यावर उतरत आहे, हा मुद्दा उपस्थित करत संजय राऊतांनी टीका केली. ‘शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, त्यांच्या जमिनी हिसकावल्या जात आहेत. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. राज्याची जनता ही स्वाभिमानी आहे. जर हे बबन लोणीकर यांना समजत नसेल, तर महाराष्ट्राने ओळखलं पाहिजे की अशा प्रवृत्तीचे लोक भाजपमध्ये सक्रिय आहेत,’ असं संजय राऊत म्हणाले.
जालन्यामध्ये भाषण करताना भाजप आमदार बबनराव लोणीकर म्हणाले,’तुझ्या अंगावरचे कपडे, पायातील बूट- चप्पल हे सगळं सरकारमुळेच. काही रिकामटेकडी कार्टी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करतात. अंधभक्त असल्याचं लिहितात. सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्याच्या माईचा पगार अन् बापाचं पेन्शन बबनराव लोणीकर यांनीच केला आहे’, असं विधान त्यांनी केलं होतं. लोणीकरांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं.