पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील मशिदींवरील अनधिकृत भोग्यांचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम शिष्टमंडळाची बैठक पार पडली. मशिदींवरून जबरदस्तीने भोंगे उतरवले जात असल्याचा आरोप यावेळी मुस्लिम संघटनांनी केला आहे. तर किरीट सोमय्या यांच्या दबावामुळे पोलीस कारवाई करत असल्याचा दावा ही मुस्लिम संघटनांकडून करण्यात आला आहे.
मुस्लिम संघटनांनी स्पष्टपणे सांगितलं की, जर किरीट सोमय्या यांच्याकडून पोलिसांवर दबाव टाकून कारवाई करण्यात आली तर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल आणि याला किरीट सोमय्या जबाबदार असतील. याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी किरीट सोमय्यांना मशिदीत जाऊ नये, त्यांच्या मशिदीत जाण्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, किरीट सोमय्या हे काही ठिकाणी मशिदीत जात असल्याचे समोर आले होते. मशिदीवरील भोंग्यासंदर्भात सोमय्या यांनी यापूर्वी सुद्धा आंदोलन केले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मशिदीवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यात आंदोलनं पेटलं होते.
दरम्यान, अनधिकृत भोंग्याच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजच्या बैठकीत एक निर्णय घेण्यात आला. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती बैठकीला हजर होते. बैठकीत पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी उच्च न्यायालयाने घातलेली ४६ ते ५६ डेसिबल आवाज मर्यादा पालन होऊच शकत नाही याच प्रात्याक्षिक दाखवलं. बैठकीत बसलेल्या लोकांचा आवाज देखील ४६ डेसिबल पेक्षा जास्त आहे, याचं प्रात्याक्षिक देवेन भारती यांनी अजित पवारांना करून दाखवलं.
त्यानंतर अजित पवारांकडून पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांना नियमांची पायमल्ली करणार्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. मात्र चुकीच्या पद्धतीने कारवाई करू नये, असेही सांगितले. तर मुंबईत १५०० भोंगे उतरवण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.