नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील नाशिक येथील त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाची संततधार कायम असल्याने गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी, सोमवारी (दि.23 ) दुपारी 2 वाजता या धरणातून 6 हजार 160 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरीला हंगामात दुसर्यांदा पूर आला आहे. नदीचा जलस्तर मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याने नागरिकांनी सुरक्षेसंबंधी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सर्वदूर पर्जन्यवृष्टी होत असल्याने धरणांच्या पाण्याच्या पातळीत समाधानकारक वाढ होऊ लागली आहे. परिणामी, अपवाद वगळता सर्वच धरणांतून विसर्ग करण्यात येत आहे. गंगापूर धरणातील जलसाठा ६१.८७ टक्क्यांवर गेल्याने शुक्रवारपासून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. हा विसर्ग सोमवारी दुपारी २ पासून 6,160 क्यूसेक वेगाने केला गेला. त्यामुळे गोदावरीला पुन्हा पूर वाहू लागला आहे.
गेल्या आठवड्यात, दि. 20 जूनपासून धरणातून कमी-अधिक प्रमाणात विसर्ग होत आहे. शुक्रवारी प्रथम 1160 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. तर शनिवारी (दि. 21) वेग वाढवून 2 हजार 320 करण्यात आला. त्र्यंबक आणि नाशिकमध्ये पावसाची संततधार कायम असल्याने पुन्हा एकदा रविवारी विसर्ग 3 हजार 944 क्यूसेकवर नेण्यात आला. पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक लक्षात घेता सोमवारी (दि. २३) पुन्हा एकदा विसर्ग वाढविण्यात आला. सध्या 6 हजार 160 क्यूसेक वेगाने धरणातून पाणी सोडले जात असल्याने गोदा काठाला पुन्हा पुराचा तडाखा बसला आहे.
गंगापूर धरण समूहातील पाणलोट क्षेत्रात होणारे पर्जन्य आणि धरणात येणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविला जाणार आहे. त्यामुळे कुणीही नदीपात्रात जाऊ नये. तसेच नदीकाठालगतचे आपले पशुधन, चीजवस्तू, विद्युत पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन नाशिक पाटंबधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे.