मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली आहे. त्यामुळे या सरकारला केंद्रात आणि महाराष्ट्रात पनवती सरकार म्हणायला हरकत नाही. सातत्याने अपघात, घातपात सुरू असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या माध्यमातून त्यांनी मावळ मधील पुल दुर्घटना आणि मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती खचलेल्या जमिनीबाबत सरकारवर निशाणा साधला आहे.
या संदर्भात संजय राऊत म्हणाले की, पुंछ भागात सतरा लोक मारले गेले, त्याच्या आधी पहलगाम येथे 26 महिलांचा सिंदूर उजाडले गेले. अहमदाबादला भयानक असा विमान अपघात झाला. वास्तविक तो अपघात की, आणखी काही? याचा तपास सुरू आहे. यातही महाराष्ट्राचे 15 ते 16 लोक मरण पावले आहेत. काल दोन दुर्घटना घडल्या आहेत. असे म्हणत राऊत यांनी सत्ताधारी भाजप महायुती वर निशाणा साधला आहे.
राज्यातील सरकार पनवती असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. नव्या पुलासाठी पैसे मंजूर झाले मात्र ते वापरले गेले नाहीत. आठ कोटींचे काम असताना पत्रावर 80 हजारांचा उल्लेख करण्यात आला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. यावर मंत्री रवींद्र चव्हाण यांची सही देखील असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. कालच्या घटनेची अजित पवार यांनी नैतिक जबाबदारी घ्यायला हवी. अजित पवार आणि त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, इंद्रायणी नदीत पूल कोसळून किमान 40 जण वाहून गेले आहेत. या पुलासाठी 8 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते म्हणतात. मात्र, संबधित मंत्र्याचे पत्र पहा, एकतर मंत्र्याने झोपेत सही केली किंवा जनतेला मुर्ख बनवले जात आहे. असा आरोप राऊत यांनी केला आहे. हे फडणवीसांचे राज्य आहे, असे चालायचेच, अशा शब्दात त्यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. यावेळी राऊत यांनी मंत्र्यांचे पत्र देखील माध्यमांना दाखवले. 8 कोटी रुपयांचे काम 80 हजारांच्या पत्रावर मंत्र्यांची स्वाक्षरी केली असल्याचा आरोप त्यांनी केला.