भुसावळ : प्रतिनिधी
वरणगाव येथून जवळ असलेल्या फुलगावजवळ राष्ट्रीय महामार्गावर शनिवार पहाटे ३ वाजेच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघातात एक जण जागीच ठार तर रिक्षातील तिघे जण जखमी झाले. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, ट्रक क्रमांक (एम. एच. ३७ टी ६७७१) वरील चालक अजहर खान सखाउल्ला खान (रा. समतानगर, कारंजा लाड, जि. वाशिम) हा भुसावळकडून वरणगावकडे भरधाव वेगाने जात असताना वेस्टन हॉटेल समोरून निघणाऱ्या पिकअप वाहन क्रमांक (एम. एच. १९ सी. वाय. ४५७६) ला जोरदार धडक दिली. या धडकेत पिकअप चालक राजू गुलाब ओंतारे (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) जागीच ठार झाले.
याच ट्रकने पढे जाऊन रिक्षा क्रमांक (एम. एच.१९ सी. डब्ल्यू, २९५०) ला जोरदार धडक दिली. यात रिक्षा सुमारे ५० मीटर अंतरापर्यंत फरपटत गेली. रिक्षाचालकासह गणेश तळेले व त्यांचा मुलगा ऐश्वर्य गणेश तळेले, मुलगी सारिका गणेश तळेले हे जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे भुसावळ येथील रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोलिस तातडीने दाखल झाले. पिकअपमधील मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविला. याप्रकरणी रिक्षा चालक अमोल ज्ञानेश्वर चौधरी यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसात ट्रकचालक अजहर खान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकों प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.