जळगाव : प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसापासून खान्देशातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचे वातावरण असून जळगाव जिल्ह्यात वीज पडून तरुणासह दोन ठार झाले. पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यात शनिवारी या घटना घडल्या. मोहित जगतसिंग पाटील (२५, रा. खेडगाव नंदीचे, ता. पाचोरा) व शांतीलाल शंकर कठोरे (४४, रा. पूरणाड, ता. मुक्ताईनगर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील ताजापुरी गावातील नथ्थू हरचंद सनेर (वय ६३) शेतकऱ्याचाही वीज पडून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील घटनेत, मोहित हा शनिवारी दुपारी खेडगाव शिवारातील शेतात आई-वडिलांसोबत मका लागवड करीत होता. दुपारी ३ वाजता पाऊस सुरू झाला आणि त्याचवेळी मोहित याच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेची माहिती मिळताच गावातील दीपक राजपूत, पंढरीनाथ पाटील, बाला पाटील, भरत पाटील, बाळासाहेब कुमावत, पोलिस पाटील चंद्रशेखर पाटील, कोतवाल गणेश पाटील, कैलास कुमावत, प्रतिश पाटील आदींनी मोहित यास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पूर्णाड येथील शेतकरी शांतीलाल शंकर कठोरे (वय ४४) हे सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली.शिरपूर येथील घटनेत, मशागत करताना अंगावर वीज कोसळून नथ्थू हरचंद सनेर (वय ६३, रा. ताजापुरी) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.