वरणगाव : प्रतिनिधी
शहरातील येथील छत्रपती शिवाजीनगर व रेणुकानगरला जोडणाऱ्या जुन्या महामार्गावरील पुलावर गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात अयुब खान रशीद खान (वय ६५) यांचा मृत्यू झाला. पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, देवा संतोष गुमळकर (रा. वरणगाव, ता. भुसावळ) हा एम.एच. ३७, एच. ९११९ या दुचाकीने लखन सुरेश बाविस्कर, यश मनोज चावरीया, रोहित मुकेशतरु शाह या चौघा मित्रांसह भरधाव वेगाने जात होता. त्याने समोरून येणाऱ्या एम.एच. १९ ई. एम. ७५२९ या दुचाकीला धडक त्याच दुचाकी चालक आयुब खान रशिद खान (रा. साई पार्क वरणगाव), आणि त्यांचे मागे बसलेले सय्यद रशीद सय्यद अमीर ६५ (रा. खडका रोड, भुसावळ) हे धडक लागून रस्त्यावर फेकले गेले.
त्यात अयुब खान यांचा जागीच मृत्यू झाला, तर सय्यद रशीद आणि इतर चारही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून जखमींना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी देवा संतोष गुमळकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.