अहमदाबाद : वृत्तसंस्था
अहमदाबाद येथून लंडन येथे जाणाऱ्या एअर इंडिया विमानाच्या भीषण अपघातात 265 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असताना, या दुर्घटनेतून एकमेव बचावलेले प्रवासी विश्वास कुमार रमेश यांची कहाणी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेले भारतीय वंशाचे 40 वर्षीय विश्वास कुमार यांनी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमधून डीडी न्यूजशी संवाद साधला आणि त्या क्षणाचे थरारक वर्णन केले.
“एक क्षण वाटलं की मीही मेलोय, पण जेव्हा डोळे उघडले, तेव्हा लक्षात आलं की मी जिवंत आहे. अजूनही विश्वास बसत नाही की मी कसा बचावलो,” असं विश्वास यांनी सांगितलं. अपघाताच्या वेळी ते इकॉनॉमी वर्गामधील डावीकडील खिडकीजवळ, म्हणजेच रांग 11 ए मध्ये बसले होते. ही जागा अगदी आपत्कालीन बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ (इमर्जन्सी एक्झिटजवळ) असते.
“टेकऑफ झाल्यानंतर अवघ्या 5-10 सेकंदांत विमान हवेत अडकलेलं वाटलं. अचानक हिरव्या आणि पांढऱ्या रंगाचे दिवे लुकलुकायला लागले. काही कळायच्या आतच विमान एका इमारतीवर जाऊन आदळलं,” असं त्यांनी आठवून सांगितलं. त्यांचं विमानाचं भाग जमिनीवरच राहिला, तर उर्वरित विमानाच्या भागांनी जवळच्या मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर धडक घेतली.
“माझ्या भागात आपत्कालीन दरवाजा होता. तो दिसल्यावर वाटलं, मी बाहेर पडू शकतो. मी प्रयत्न केला आणि यशस्वी झालो. कदाचित विमानाच्या दुसऱ्या बाजूच्या लोकांना तो पर्याय मिळाला नाही,” असंही रमेश म्हणाले. अपघातानंतर लागलेल्या आगीत त्यांच्या डाव्या हाताला भाजल्याची माहिती त्यांनी दिली.
“माझ्या समोर दोन प्रवासी आणि दोन एअर होस्टेस जळून गेले. मी धडपडत त्या धुळीतून आणि कोसळलेल्या धातूंच्या ढिगाऱ्यातून चालत बाहेर आलो,” असं त्यांनी अत्यंत भावनिक स्वरात सांगितलं.
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलला भेट देत विश्वास कुमार यांची विचारपूस केली. “पंतप्रधानांनी माझी तब्येत विचारली आणि सगळं कसं घडलं ते जाणून घेतलं. मी त्यांना सांगितलं की आता मी ठीक आहे,” असं विश्वास यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदींनी अपघातस्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी घटनास्थळी बचावकार्यांची माहिती घेतली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर लिहिलं आहे की, “अहमदाबादमधील अपघातस्थळी जाऊन पाहणी केली. ही दुर्घटना मन सुन्न करणारी आहे. आपले कार्यकर्ते आणि अधिकारी अथक प्रयत्न करत आहेत. आपली भावना त्यांच्या सोबत आहे, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं. ही शोकांतिका शब्दात व्यक्त करता येणार नाही अशी आहे. सर्व मृतांच्या कुटुंबीयांना मनापासून शोकसंवेदना. ओम शांती.” त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू किन्जारापु, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे गृह मंत्री हर्ष संघवी उपस्थित होते.