नागपूर ; वृत्तसंस्था
मागील महिन्यात भारताच्या वतीने राबवण्यात आलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे ‘कम्प्युटर गेम’ असल्याचे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर आता भारतीय जनता पक्षाने देखील टीका केली आहे. नाना पटोले यांचे मन आणि मेंदू भ्रष्ट झाला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून नाना पटोले यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या देशद्रोही मानसिकतेला देश कधीच माफ करणार नाही, या मानसिकतेचा आम्ही निषेध करत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली पोस्ट देखील पहा…
‘ऑपरेशन सिंदूर म्हणजे कम्प्युटर गेम आहे’ असं संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलं आणि ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणं म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि त्यांच्या शौर्यांचा अपमान नाहीतर संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे. नाना पटोले यांच्या या बाष्कळ विधानामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना किती वेदना होणार आहेत, याची कल्पना या संवेदनाहीन माणसाला आहे की नाही?
नाना, ऑपरेशन सिंदूर म्हणजे कम्प्युटर गेम नाही तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेली धाडसी आणि शौर्याची कारवाई आहे. ही देशद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवणारी जाज्वल्य शौर्यगाथा आहे!
देशाच्या जवानांचं शौर्य, दहशतवादाविरोधातील कारवाई आणि ‘भारत माते’च्या रक्षणासाठीचा लढा काँग्रेसला खेळ वाटतो? तुमचे नेते राहुल गांधी ही परदेशात जाऊन भारताचा अवमान करतात. ‘सर्जिकल स्ट्राइक’चाही पुरावा मागण्याची नीच मानसिकता काँग्रेसनं दाखवली. पण देश उघड्या डोळ्यांनी पाहतोय की कोण वीरांच्या बाजूला आहे, आणि कोण पाकिस्तानच्या!
नाना, तुमच्या या देशद्रोही मानसिकतेला देश कधीच माफ करणार नाही. तुमचा मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे. मी तुमच्या नीच मानसिकतेचा कडाडून निषेध करीत आहे.