अहमदाबाद : वृत्तसंस्था
242 प्रवाशांना घेऊन अहमदाबादवरुन लंडनला निघालेले विमान अहमदाबादमधील रुपानी नगर येथे कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. टेक ऑफनंतर काही मिनिटांमध्येच विमान कोसळले असून घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अहमदाबादमधील मेघानी नगर येथे गुरुवारी दुपारी जोरदार आवाज आला आणि परिसरात धूराचे लोट दिसू लागले. काही क्षणांतच हा विमान अपघात असल्याचे स्पष्ट झाले. एअर इंडियाचे हे विमान असून सरदार वल्लभभाई विमानतळावरून दुपारी एक वाजून 17 मिनिटांनी विमानाने टेक ऑफ केले होते. यानंतर काही मिनिटांमध्येच हे विमान मेघानीनगरमधील निवासी भागात कोसळले.
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, AI 171 हे विमान अहमदाबादहून लंडनमधील गॅटविक विमानतळाच्या निघाले होते. विमानात एकूण 242 जण होते. यात 10 कॅबिन क्रू आणि 2 वैमानिकांचा समावेश आहे. कॅप्टन सुमित सब्रवाल आणि क्लाईव कुंदर अशी वैमानिकांची नावे आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून अपघातात जीवितहानी झाली आहे का, जखमींची संख्या किती याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, घटनास्थळावरील दृश्य पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. निवासी भागात विमान कोसळल्याने परिसरात हा आकडा आणखी वाढेल, असा अंदाजही वर्तवला जातोय.
विमान अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडला असावा, असा अंदाज हवाई वाहतूक तज्ज्ञांनी वर्तवला आहे. दुसरीकडे अपघाताचे वृत्त समजताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांशी दुरध्वनीवरून चर्चा केली आहे. बचावकार्यात केंद्र सरकारच्या मदतीची तयारीही दर्शवली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबतची पोस्ट X वर (पूर्वीचे ट्विटर) टाकली आहे.