मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल होत असतांना आता मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांमध्येही मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 8 जून रोजी संपूर्ण राज्यामध्ये पाऊस सक्रिय राहणार आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे सामान्यतः ढगाळ आकाश राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोकण विभागातील रायगड आणि रत्नागिरीला 8 जूनसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सोलापूरमध्ये 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहून, विजा गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस सक्रिय असणार आहे. 8 जूनसाठी मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर वगळता इतर सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
विदर्भातील देखील बहुतांश जिल्ह्यांना 8 जून रोजी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांना 8 जून रोजीसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.