पुणे : वृत्तसंस्था
राज्यात ठाकरे बंधू यांची युती होणार असल्याचे संकेत असतांना राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. मात्र, या संभाव्य एकीबाबत कोणताही ठोस निर्णय अद्याप झाला नसल्याचे स्पष्ट आहे. अशा स्थितीत, एकीकडे ठाकरे गटात नेत्यांची सतत ‘इनकमिंग’ सुरू असून दुसरीकडे मनसेमधून नेत्यांची गळती वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. पुणे दौऱ्यावर असताना पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी राज ठाकरे यांच्या सभांबाबत खळबळजनक निरीक्षण मांडले.
“राज ठाकरे यांच्या सभा आकर्षक आणि गजबजलेल्या असतात, त्यांना चांगली गर्दी मिळते, मात्र त्या सभा मतांमध्ये रूपांतरित होत नाहीत. माझा आतापर्यंतचा अनुभव असाच आहे,” असे परखड मत शरद पवार यांनी यावेळी मांडले. त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभांवर विश्वास व्यक्त करत सांगितले की, “उद्धव ठाकरे यांच्या सभांमुळे मतांमध्ये निश्चित परिवर्तन घडताना दिसतं.”
पुढे बोलताना शरद पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात, अशी इच्छा व्यक्त केली. याउलट, “महायुतीचे पक्ष या निवडणुका एकत्र लढवतील, असं चित्र सध्या तरी दिसत नाही,” असा सूचक टोला त्यांनी विरोधकांना लगावला. दरम्यान, मनसेसाठी आणखी एक धक्का बसला आहे. पक्षाचे एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी मनसेची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना संघटनात्मकदृष्ट्या मोठा झटका बसला आहे. तुर्डे यांच्या प्रवेशामुळे शिंदे गट अधिक बळकट होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.