धरणगाव : प्रतिनिधी
“संत कधीच स्वार्थ बघत नाहीत, तेच खरे संत थोर. देवापेक्षा संत मोठे आहेत, कारण संतांमुळेच देवाची अनुभूती घडते,” असे भावपूर्ण प्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर यांनी पाळधी येथे केले.
ते पुढे म्हणाले की, “पतिव्रतेच्या भक्तीला देवही नमतो, पती परमेश्वर हेच देवाचे रूप आहे. तुकोबाराय म्हणतात – तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता’ म्हणजेच भक्तीची ती पराकाष्ठा आहे,” असे सांगत त्यांनी उपस्थित भाविकांना अंतर्मुख केलं. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा आधार घेत त्यांनी संतांचे महात्म्य, भक्तीचा प्रभाव, आणि समाजातील नातेसंबंधांतील आध्यात्मिक दृष्टीकोन प्रभावीपणे मांडला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन रंगले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर, ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर यांचीही उपस्थिती होती. कीर्तनादरम्यान वातावरण भक्तिरसात न्हालं होतं.
पाळधीतील अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तनाच्या वेळी पावसाने तीन वेळा हजेरी लावली. मात्र, पावसात चिंब होतही पालकमंत्री गुलाबराव पाटील व हजारो भाविक जागेवरून हलले नाहीत. ते बसून भक्तीरसात तल्लीन होते.
बाळू महाराज म्हणाले, “हा केवळ भक्तीचा अनुभव नव्हे, तर एक आंतरिक साधनेचा परिपाक आहे.”
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रसंग आजपर्यंतच्या सप्ताहांमध्ये कधीच अनुभवायला मिळाला नव्हता.
कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, विक्रम पाटील, जी.पी.एस. मित्रपरिवार व शिवसेना-युवासेना परिवार यांनी संयुक्तपणे केले. त्यांच्या नियोजनशैलीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने पाळधी गावाने एकात्मता, धर्मशीलता, आणि भक्तीमय परंपरेचे दर्शन घडवले. गावगाड्याच्या आध्यात्मिक उन्नतीचा हा सप्ताह कायमचा आठवणीत राहील, हे नक्की