चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील गलंगी गावाजवळ गोरक्षकांच्या मदतीने ग्रामीण पोलिसांनी मालेगाव येथे जाणाऱ्या १८ उंटांना पकडत जीवनदान दिल्याची घटना घडली होती. यातील चौघं आरोपींना चोपडा न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ जूनपर्यंत तीन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गोरक्षक जिग्नेश कंखरे संग्राम परदेशी, पंकज नरवाडे आदींनी पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना गलंगी गावाजवळ दोन ट्रकमधून काही उंटांची वाहतूक केली जात असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करीत हरी नायक, मोतीलाल नायक दोन्ही रा. इंदूर (म.प्र.) खलीद खान रा. देवास (म.प्र.). सहाम फकरू बागवान रा. धार (म.प्र.) यांना उंट कत्तलीसाठी तस्करी करत असल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून उंट किंमत ९ लाख रुपये, दोन वाहने किंमत २० लाख रुपये असा २९ लाखांचा मुद्देमाल चोपडा पोलिसांनी जप्त करून त्यांना अटक केली होती.