चाळीसगाव : प्रतिनिधी
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून करत पतीनेही आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथे २ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मृत पतीच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथील विजय सुकदेव चव्हाणके (४५) हा पत्नी वर्षा (४०), मुले तसेच आईसह हातगाव शिवारात शेतात राहत होता. त्याचे गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामुळे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यामुळे त्याचे आणि त्याच्या पत्नीचे कौटुंबिक कारणातून वाद होत असत. यातून तो पत्नी वर्षा यांच्या चारित्र्यावर संशय घेत असे. २ रोजी सकाळी ११:२५ वाजेच्या सुमारास विजय याने मोठा भाऊ अशोक सुकदेव चव्हाणके यांना फोन करून आपण पत्नी वर्षाला संपविले असून, स्वतः सुद्धा बरेवाईट करणार असल्याचे सांगितले. या घटनेने हादरलेल्या अशोक चव्हाणके यांनी कुटुंबासह भाऊ विजय व त्याची पत्नी वर्षा यांच्या शोधासाठी शेतात धाव घेतली असता, शेतामध्ये असलेल्या आंब्याच्या झाडाला विजय हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
त्याची पत्नी वर्षा शेतातील गुरांच्या चाऱ्यामध्ये मयत अवस्थेत आढळून आली. तिच्या गळ्याभोवती सुती दोरी गुंडाळलेली होती. त्यामुळे लहान भाऊ विजय सुकदेव चव्हाणके याने पत्नी वर्षा हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केला व स्वतः आत्महत्या केल्याची फिर्याद अशोक चव्हाणके यांनी दिली. पोलिस निरीक्षक राहुल पवार तपास करीत आहेत.
पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांच्यासह चाळीसगाव ग्रामीणचे निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलिस उपनिरीक्षक शेवाळे, राहुल प्रदीप राजपूत, हवालदार ओंकार सुतार व टीमने घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाच्या दृष्टीने फॉरेन्सिक टीमदेखील दाखल झाली. या घटनांचा पंचनामे करून फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले.