जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील महसूल मंडळ वाकडी अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाकडी येथे दिनांक ०२ जून २०२५ रोजी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” उत्साहात व यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरास नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला.
शिबिराचे उद्घाटन तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या प्रास्ताविकाने झाले. त्यांनी आपल्या भाषणात शिबिराच्या उद्देशाविषयी माहिती देताना सांगितले की, “नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवणे व शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ गावातच उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य हेतू आहे.” या शिबिरात विविध विभागांनी आपापल्या सेवा आणि योजनांचा लाभ नागरिकांना थेट दिला.
संजय गांधी निराधार योजना (DBT प्रक्रिया) – ७८ लाभार्थी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय – ६८ शेतकऱ्यांना सेवा, पुरवठा विभाग – शिधापत्रिका वाटप – ६४ लाभार्थी, सेतू केंद्रमार्फत प्रमाणपत्रे वाटप, उत्पन्न दाखले – ३२, जातीचे दाखले – ३८, अधिवास व रहिवास दाखले – ४०, ग्रामपंचायत विभाग – मनरेगा जॉब कार्ड वाटप – १४ लाभार्थी. या शिबिरातून एकूण ३२० नागरिकांना थेट सेवा व लाभ देण्यात आले.
शिबिरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, “पूर्वी प्रमाणपत्रे, शिधापत्रिका किंवा योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेकदा सरकारी कार्यालयांचे फेरे मारावे लागत होते. मात्र या शिबिरामुळे सर्व सेवा गावातच मिळाल्याने वेळ व पैसा वाचला.” कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे तातडीने निरसन केले आणि अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन दिले.
या उपक्रमामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावपातळीवर त्वरित मिळाल्याने नागरिकांचा शासनावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. यापुढेही अशा उपक्रमांद्वारे नागरिकांना सेवा देण्यात येईल, असा विश्वास तहसील कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आला.