जळगाव : प्रतिनिधी
राज्य शासनाकडून राबविण्यात आलेल्या “१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम” अंतर्गत, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव या कार्यालयाची राज्यस्तरावर प्रथम क्रमांकावर निवड झाली आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. संजय शिरसाठ यांच्या हस्ते पुणे यशदा येथे झालेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत दिनांक ३१ मे 2025 रोजी
जळगावचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांचा प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.
या गौरव समारंभास मा. प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे (भा.प्र.से.), मा. आयुक्त श्री. ओमप्रकाश बकोरिया (भा.प्र.से.), तसेच मा. महासंचालक, बार्टी श्री. सुनील वारे उपस्थित होते.
“१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम” ही राज्य शासनाने शासकीय कार्यालयांमध्ये पारदर्शकता, गतिशीलता, कार्यक्षमता, आणि नागरिकाभिमुख सेवा देण्याच्या उद्देशाने राबवलेली अभिनव योजना आहे. या मोहिमेंतर्गत सर्व जिल्हा कार्यालयांची विविध निकषांवर तपासणी करण्यात आली. कार्यक्षम कारभार, वेळेत काम पूर्ण करणे, तांत्रिक साधनांचा वापर, व कामकाजात पारदर्शकता हे प्रमुख निकष होते. जळगाव जिल्ह्यातील सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाने सेवा वितरणात नवकल्पना राबवणे, डिजिटल प्रक्रियेचा प्रभावी वापर, वेळेवर योजना अंमलबजावणी, नागरिकांच्या तक्रारींवर त्वरीत कारवाई यामुळे राज्यातील इतर सर्व कार्यालयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयाचे अभिनंदन केले आहे. या यशामागे संपूर्ण कार्यालयीन टीमचे संघटन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सेवाभाव असल्याचे सहायक आयुक्त श्री.योगेश पाटील यांनी सांगितले. राज्य शासनाच्या वतीने अशा सुधारणा उपक्रमांमधून शासकीय यंत्रणांमध्ये सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातील ही यशोगाथा इतर कार्यालयांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मंत्री श्री. शिरसाठ यांनी यावेळी व्यक्त केला.