मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना दिल्या आहेत. या सूचनांनुसार, आगामी निवडणुकींच्या तयारीला वेग आला असून, लवकरच निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत. या निवडणुकांसाठी चार आठवड्यांमध्ये प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने त्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवात देखील केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना करण्यात आली आहे. त्यानंतर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. निवडणुकींच्या तारखा आणि इतर तपशील लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे.
सुप्रीम कोर्टाने मागच्या महिन्यात राज्य सरकारला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. तसेच ४ आठवड्यात आधीसूचना जारी करण्यासही सांगितले होते. त्यानुसार आता राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया करण्यास सुरूवात केली आहे. प्रभाग रचनेचे अधिकार महाविकास आघाडीच्या काळात सरकारने स्वत:कडे घेतले होते. आता प्रभाग रचना पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत.
दरम्यान, राज्याच्या राजकीय वर्तुळातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. भाजप, शिवसेनेकडून निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु केली असून भाजप स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत. दुसरीकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे मुंबई पालिका निवडणुकीत 100 जागांची मागणी केल्याचेही बोलले जात आहे.