कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात महिलांबाबत धक्कादायक घटना घडत असतांना आता कोल्हापूर जिल्ह्यातील राजारामपुरी येथे एक धक्कादायक उघडकीस आली आहे. एका चाळीस वर्षीय महिलेला तिच्या भाच्याने साखळदंडाने बांधून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, क्राइम ब्रांच आणि राजारामपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी साखळदंडातून सदरील महिलेची सुटका केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राजारामपुरी परिसरामध्ये एका महिलेला साखळदंडातून मुक्त करण्यात आले आहे. सारिका साळी असे या चाळीस वर्षीय महिलेचे नाव असून पोलिसांनी या महिलेची सुटका केली आहे. संबंधित महिला ही वेडसर असून रस्त्यावर फिरताना काहीही उचलून घेते आणि खाण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तिच्या घरच्या मंडळींनी तिला दोन महिन्यांपासून साखळदंडात बांधून ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी कुलूप फोडणाऱ्या व्यक्तीला बोलावून या महिलेची सूटका केली.
सदरील महिला ही तिच्या भाच्याजवळ राहते. यात तिचा भाऊ आणि भावाची बायको म्हणजेच भावजय आणि भाचा हे सर्व एकत्र राहतात. मात्र गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून या महिलेला साखळदंडात बांधून ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येत असून त्यांना लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळतात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी संबंधित महिलेला साखळदंडात बांधणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या मागणी केली आहे. शिवसेनेचे नेते संजय पवार यांनी यात सदरील महिलेला बांधून ठेवणाऱ्या भाच्याच्या देखील कानशिलात लगावली आहे. या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.