मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात मान्सून दरवर्षी प्रमाणे यंदा लवकर सुरु झाला असून आता मुंबईत देखील मान्सून दाखल झाला आहे. सध्या मुंबई शहर आणि उपनगरात सध्या जोरदार पाऊस कोसळत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही तासांमधील पावसामुळे आताच मुंबईतील सखल भाग आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. रस्त्यांवर आणि घरात देखील पाणी साचल्याचे दिसत आहे.
मुंबई आणि उपनगरातील पावसाचा लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पहिल्याच पावसात पुन्हा एकदा मुंबई तुंबल्याने ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
“गेल्या ३ वर्षांपासून बीएमसीवर नियंत्रण ठेवणाऱ्या भाजप सरकारच्या पूर्ण उदासीनतेमुळे आज मुंबई ठप्प झाली आहे. मुंबईमध्ये अशा ठिकाणी पाणी साचले आहे जिथे पूर्वी कधीही पाणी साचले नव्हते. २०२१/२२ मध्ये आपण ज्या हिंद माताला पाणी साचण्यापासून मुक्त केले होते, ती आज पुन्हा पाणी साचले आहे कारण महापालिकेने वेळेवर पाणी उपसण्याची प्रक्रिया सुरू केली नाही,” असे आदित्य ठाकरेंनी ट्वीट करत लिहिले आहे.
“गेल्या आठवड्यात अंधेरी सबवे आणि साकी नाका होता. आज असे अनेक भाग आहेत जिथे भाजपच्या निष्क्रियतेचा थेट फटका सामान्य मुंबईकरांना बसत आहे. भाजपला मुंबईचा इतका द्वेष का आहे की त्यांनी मुंबईला अर्धवट रस्ते, नाले साफ न केलेले आणि पूर्वीपेक्षा जास्त ठिकाणी पाणी साचल्याने अडचणीत आणले आहे,” असे आदित्य ठाकरे यांनी म्हंटले आहे.