जळगाव : प्रतिनिधी
शहरातील समता नगरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, येथे राहणाऱ्या ४९ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासंदर्भात रामानंदनगर पोलिस ठाण्यात सकाळी १० वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, ईश्वर सुखदेव वाघ (वय ४९) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर वाघ हे पत्नी संगीता आणि मुलगा रणजित यांच्यासोबत समता नगरात राहत होते. हातमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. बुधवारी रात्री ११ वाजता जेवण केल्यानंतर ते मागच्या खोलीत झोपायला गेले. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. गुरुवारी सकाळी ६ वाजता हा प्रकार समोर आल्यानंतर नातेवाइकांनी त्यांना तत्काळ खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. ईश्वर वाघ यांच्या पश्चात पत्नी संगीता आणि मुलगा रणजित असा परिवार आहे.