जळगाव : प्रतिनिधी
‘मी येणार नाही, घरी लक्ष ठेव!’ असे बहिणीला मोबाइलद्वारे कळवून हिरालाल नारायण चौधरी (५२, रा. विठ्ठलपेठ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १६ मे रोजी रात्री कुसुंबा शिवारात उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कंपनीमध्ये कामाला असलेले हिलाराल चौधरी हे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी यांच्यासह विठ्ठलपेठेत राहत होते. ते १४ मेपासून घरून निघून गेलेले होते. १५ मे रोजी त्यांनी त्यांच्या बहिणीशी संपर्क साधून ‘मी येणार नाही, घरी लक्ष ठेव!’ असे कळविले होते. त्यानंतर १६ मे रोजी रात्री कुसुंबा शिवारातील एका शेतात ते गळफास घेतलेल्या अवस्थेत एका जणाला दिसले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.