जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातून एका तरुणासोबत अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. तरुणाचे आठ दिवसांवर लग्न आले असताना त्याने आपले आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाने टोकाचे पाऊल उचलले आहे. सोमवारी रात्री तरुणाने कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर तो शेतात गेला, मात्र घरी परतलाच नाही. त्यानंतर शेतात झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्न घरात लग्नाची धामधूम सुरु होती. पाहुणे मंडळींना पत्रिका वाटप सुरु होते. आठवडाभरात लग्न आल्याने घरात तयारी आणि आनंदाचे वातावरण होते असे असताना उपवर अमोल वाल्मीक पाटील (वय 21, रा. वाकडी, ता. जळगाव) या तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील वाकडी येथील शेतामध्ये मंगळवार दि. 13 मे रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लग्नाच्या आनंदाच्या क्षणी होणाऱ्या नवरदेवाने टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
वाकडी येथे आई, वडील, दोन भावांसह राहणारा अमोल पाटील हा वडिलांना शेती कामात मदत करत होता. अमोल याचे खामखेडा, ता. मुक्ताईनगर येथील मुलीशी लग्न ठरले होते. दि.20 मे रोजी हळद आणि दि. 21 मे रोजी लग्न असल्याने घरात लग्नाची तयारी देखील सुरू होती. सोमवार दि. 12 मे रोजी रात्री जेवण झाल्यानंतर तो शेतात गेला. नंतर घरी परतलाच नाही. सकाळी काही ग्रामस्थांना अमोल पाटील हा शेताच्या बाजूला एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. याची माहिती तात्काळ त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली. त्याला लगेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून अमोल याला मृत घोषित केले. लग्नाच्या केवळ आठ दिवस आधी तरुणाने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामागे नेमके कारण काय होते, लग्न जवळ आले असताना त्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय का घेतला? हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही.