अमरावती : वृत्तसंस्था
भारत – पाकिस्तानमध्ये तणाव सुरु असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी सवांद साधल्यानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असतांना आता प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
नेहमी-नेहमी पाकिस्तानचे वार सुरू असतात. पाकिस्तानच नेहमीचं दुखणं बंद केलं पाहिजे. जसा इंदिरा गांधी यांनी बांगलादेश वेगळा काढला, तसाच पाकिस्तान भारतात घ्यावा. त्यासाठी जर सैनिक कमी पडत असतील तर प्रहारचा कार्यकर्ता आणि हा बच्चू कडू तयार असल्याचे प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यांची जोरदार चर्चा रंगली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर रावबत भारताने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. भारताने केलेल्या या कारवाईविरोधात पाकिस्तानने ड्रोन, क्षेपणास्त्र डागून कुरापती करण्यास सुरुवात केली होती. पण पाकिस्तानचा प्रत्येक वार भारताने नष्ट केला. तीन दिवस चाललेल्या तीव्र संघर्षानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी शस्त्रविरामावर सहमती झाली. पाकिस्तानकडून शस्त्रविरामाचा प्रस्ताव आल्यावर ही सहमती लागू करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. भारत-पाकिस्तानच्या युद्धविरामानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत विचारले असता बच्चू कडू म्हणाले की, असे झाले तरी जनतेचे काय भले होणार आहे? राष्ट्रवादी कधी वेगळी होती? पवार साहेब आणि अजित दादा हे वेगळे होते हे शक्य आहे का? ते एकत्रच होते.मीडियासमोर आणि लोकांसमोर नव्हते. मात्र ते एकत्रच होते, असा दावा देखील बच्चू कडू यांनी केला.