जळगाव : प्रतिनिधी
राज्यात आपलेच सरकार असल्याने कुठूनही कामे करता येतील. मात्र, काही जण नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी लाचारी पत्करत असल्याचा टोला माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेता लगावला.
अनेक महिन्यांपासून नाशिकला पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. नाशिकची धुरा कोणाकडे जाणार याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. सध्या मला पालकमंत्री करा, अशी मागणी करत लाचारी पत्करण्याचे काम काही जणांकडून होत आहे. मात्र, कशाला हवे पालकमंत्रिपद जिथे दिले तिथे काम करावे. संपूर्ण राज्यात आपलीच सत्ता आहे, अशी पुष्टी खडसे यांनी यावेळी जोडली. तसेच काहींनी विशेष कारणासाठी पालकमंत्रिपदासाठी आग्रही भूमिका मांडल्याचा आरोपही केला. कुंभमेळ्याची अनेक कामे रखडलेली आहेत. मुळात पालकमंत्री असेल तरच कुंभमेळ्याची कामे होतात, असे काही नाही. ती जबाबदारी सरकारची आहे. प्रशासन आणि इतर मंत्री याबाबत पुढाकार घेऊन कामाला वेग देऊ शकतात त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी यावेळी खडसे यांनी केली.