नागपूर : वृत्तसंस्था
फिरायला जात आहोत, असे सांगून नागपूर येथून कुही फाट्यालगत गिट्टी खदानच्या खोल खड्यात पाच जणांना जलसमाधी मिळाली. मृतकांमध्ये धुळ्याच्या एकाच कुटुंबातील आई व तिच्या दोन लेकरांचा समावेश आहे. धुळ्यातील ही मंडळी माहेरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी आली होती.
सविस्तर वृत्त असे कि, रज्जु उर्फ रंजना सूर्यकांत राऊत (२२, नागपूर), रोशनी चंद्रकांत चौधरी (३२), मोहीत चंद्रकांत चौधरी (१०), लक्ष्मी चंद्रकांत चौधरी (८, तिघेही रा. लक्ष्मी नगर धुळे) व एहतेशाम मुक्तार अन्सारी (२०, नागपूर) यांचा मृतांत समावेश आहे. पाचही जण याठिकाणी पोहताना ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेची माहिती चौधरी कुटुंबियांना सोमवारी दुपारी ३ वाजता मिळाली. त्यानंतर पती चंद्रकांत आणि त्यांचे भाऊ पंकज चौधरी तातडीने नागपूरकडे रवाना झाले. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मृतांवर नागपूरलाच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
नागपूर येथे माहेरी आलेल्या रोशनी चौधरीचा १० मे रोजी वाढदिवस होता. नागपूरला आई वडील व लहान बहिणीसोबत त्यांनी वाढदिवस साजरा केला. त्यानंतर व्हॉटस्अॅपवर स्टेटस फोटोही ठेवले होते. वाढदिवसाला परिसरातील नातेवाईक देखील आले होते. माहेरी आपल्या आई, वडील आणि बहिणीसोबत साजरा केलेला वाढदिवस हा रोशनी यांच्यासाठी शेवटचा ठरला. कारण दुसऱ्या दिवशीच ही दुर्देवी घटना घडली.
रात्री उशीरापर्यंत परत न आल्याने वडील सूर्यकांत त यांनी पोलिसांकडे हरविल्याची तक्रार नोंदविली. दुसरीकडे या कुटुंबीयांसमवेत एहतेशाम हा सुद्धा गेला होता. तो सुद्धा परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलिस ठाणे गाठले होते. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने सायबर विभागाला लोकेशन ट्रेस करण्याची सूचना केली. सोमवारी सकाळी रोशनी हिचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आले. गिट्टीखदानच्या कडेला एक दुचाकी, चप्पलचे जोड आणि कपडे पडून होते. ओळख पटली. अन्य चार जणांचे प्रेत गोताखोरच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले.