नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव वाढला असून सध्या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरीही अद्याप हा तणाव निवळलेला नाही. शत्रूराष्ट्र पाकिस्तानने काही कुरपाती केल्याच तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय सेना सज्ज आहे. असे असतानाच आता भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर मोठी माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता संपूर्ण देशाला संबोधित करणार आहेत. मोदी आज देशाशी बातचित करणार असून यावेळी ते नेमकं काय बोलणार ? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मोदी यांनी आपला परदेश दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर मोदींनी देशात येऊन अनेक बैठका घेतल्या होत्या. केंद्रीय गृहराज्यमंत्री, संरक्षणंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, तिन्ही सेनादलाचे प्रमुख यांच्यासोबत मोदी यांच्या महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. या बैठकांत राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद, भारताचे पाकिस्तानविरोधातील धोरण अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच या बैठकांनंतरच भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवले. या सर्व घडामोडींनंतर आता मोदी देशाला संबोधित करणार आहेत.