जळगाव प्रतिनिधी । शहरातील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत विशेष उपक्रम मुले व मुली व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे उद्घाटन ४ एप्रिल २०२२ रोजी उद्घाटक सामाजित कार्यकर्ता भालचंद्र शंकर चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी व व्याख्याते डॉ. स्नेहल फेगडे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे , विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. प्रियंका ब-हाटे , डॉ. राजकुमार लोखंडे हे उपस्थित होते. ४ एप्रिल ते ६ एप्रिल दरम्यान चालणाऱ्या या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत १० व्याख्यानांचे आयोजन करण्यात आलेले आहे. जातीय सलोखा , सोशल मीडिया, राष्ट्रीय एकता व एकात्मता, भाषण संभाषण सूत्रसंचालन कौशल्य, लिंग समभाव, रोजगाराच्या संधी कशा शोधाव्या, ताण तणाव मुक्त परीक्षा या विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या उद्घाटकीय मनोगतातून मा. श्री. भालचंद्र शंकर चौधरी यांनी “व्यक्तिमत्व विकास हा शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात काम करत असताना महत्त्वाचा ठरतो. तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी असेल तर त्याची छाप तुम्ही समोरच्या व्यक्तीवर पाडू शकतात. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना तुमच्या व्यक्तिमत्त्वाची दखल घेतली जाते. सामाजिक जाणिवेचे भान प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठेवणे गरजेचे आहे.”असे प्रतिपादन विद्यार्थ्यांना संबोधित करताना केले “.
अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी, ” मुले-मुली व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडले जातात. विद्यापीठाने आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व सामाजिक विकास साधला जातो असे मार्गदर्शन केले.
प्रथम सत्रात डॉ. स्नेहल फेगडे यांनी , व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन करताना, विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे . व्यक्तिमत्वासाठी भाषेवर प्रभुत्व असणं महत्त्वाचं आहे संभाषण कौशल्य आत्मसात करता आले पाहिजे . झालेला अपमान सकारात्मक पद्धतीने घ्यायला हवा. मनाविरुद्ध घटना घडल्या तर चिडचिड न करता शांत राहावे. सकारात्मक दृष्टीने विचार करायला शिका.” असे आपल्या व्याख्यानातून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
द्वितीय व्याख्यान स्पर्धा परीक्षा, या विषयावर प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी “जिंकण्यासाठी लढलं पाहिजे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास बंद खोलीत बसून होत नसतो तो स्वतःचा करायचा असतो. चिकाटी ठेवा, वाचन करा, दुसऱ्याने दिलेल्या वर अवलंबून न राहता स्वतः प्रयत्न करा. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले.
तृतीय व्याख्यान, ” मुलगी वाचवा मुलगी शिकवा” या विषयावर प्रा. संध्या महाजन यांनी “वाचवणे व शिकवणे ही आजही काळाची गरज बनली. मुलींच्या जन्माचे स्वागत केलं पाहिजे. समाजात आजही या विषयी जागरूकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. मुलगा व मुलगी यांच्या जन्माचं गुणोत्तर समान असणं महत्त्वाचं आहे.” असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. प्रियंका ब-हाटे यांनी केले . सूत्रसंचालन प्रा. देवयानी पाटील यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.