नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय जवानांनी पाकिस्तान आणि पीओकेमधील ज्या ९ ठिकाणांना लक्ष्य केले होते. त्यापैकी एक ठिकाण बहावलपूर आहे, ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचे कुटुंबाच उद्ध्वस्त झाले आहे. त्याच्या कुटुंबातील १० सदस्यांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, मसूद अझहरचे एक स्टेटमेंट समोर आल्याचे म्हटले जात आहे. ऑपरेशन सिंदूर मोहिमेंतर्गत झालेल्या हवाई हल्ल्यात अझहरच्या परिवारातील १० आणि जवळचे ४ लोक ठार झाले आहेत. हे पाहून मसूद अजहरने ‘मी ही मेलो असतो बरं झालं असतं,’ असे स्टेटमेंट दिल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात ८० हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. जिथे प्रत्येक ठिकाणी २५-३० दहशतवादी ठार झाले. पैकी बहावलपूर आणि मुरीदके येथे सर्वात तीव्र कारवाया करण्यात आल्या.
पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, बुधवारी पहाटे भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. बुधवारी (दि.७) रात्री १.३० वाजता बहावलपूर, मुरीदके, बाग, कोटली, मुझफ्फराबाद यासह नऊ ठिकाणी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत हल्ले करण्यात आले. यामध्ये बहावलपूर येथे करण्यात आलेल्या अचूक हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच्या कुटुंबातील दहा सदस्य आणि जवळचे चार सहकारी मारले गेले आहेत.
भारतीय हवाई हल्ल्यात मसूद अजहरची बहिण देखील ठार झाली. दहशतवाद्यांचे नातेवाईक देखील हल्ल्यात मारले गेले आहेत. जैश-ए-मोहम्मदने स्टेटमेंट जारी करत सांगितले आहे की, मसूद अजहरची मोठी बहिण ठार झाली. तर मुफ्ती अब्दुल रऊफची नातवंडे, मोठ्या मुलीचे ४ मुले जखमी झाले. मृत्यू झालेल्यांमध्ये अधिकतर महिला आणि मुलांचा समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पत्रकाराने म्हटले की, रात्री जेव्हा पहिला धमाका ऐकू आला तेव्हा आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले. काहीच वेळानंतर दुसरा धमाका ऐकू आला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, दोन किलोमीटर अंतरावरील घरांच्या खिडक्या फुटल्या.