जळगाव : प्रतिनिधी
बारावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने दोन विद्यार्थ्यांनी सोमवारी दुपारी निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळातच आत्महत्या केली. ममुराबाद व पाचोरा येथे झालेल्या या घटनांमुळे दोघांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला. भावेश मधुकर महाजन (वय १९, रा. एरंडोल) आणि ऋषिकेश दिनेशचंद्र पाटील (१८, रा. ममुराबाद, ता. जळगाव) अशी या विद्यार्थ्यांची नावे असून त्यांना अनुक्रमे ४२ व ४९ टक्के गुण मिळाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथे राजीव गांधी काॉलनीत बहिणीकडे आलेल्या भावेश याने बहिणीच्या घरीच गळफास घेतला. तो एरंडोल येथे डीडीएसपी महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होता. बहीण आणि मेहुणे विशाल महाजन हे पुणे येथे लग्नानिमित्त गेले होते. भावेशची दुसरी बहीण जेवणाचा डबा पोहोचविण्यासाठी संपर्क करीत असताना भावेशचा फोन बंद येत असल्याने शोध घेतला असता, ही धक्कादायक घटना दिसून आली. पाचोरा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भावेश याच्यापश्चात आई-वडील, तीन विवाहित बहिणी, दोन भाऊ असा परिवार आहे.
ममुराबाद येथील ऋषिकेश याच्याबाबत तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ऋषिकेश हा धुळे येथे आत्याकडे राहून इयत्ता बारावीचे शिक्षण घेत होता. ऋषिकेशने चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ऋषिकेशच्या आईच्या किडन्या निकामी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बराच वेळ झाला तरी मुलगा दिसत नसल्याने आई त्याला बोलावण्यासाठी खोलीत गेली असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. रसवंती व शेती व्यवसाय असलेले दिनेशचंद्र पाटील यांना दोन मुले असून, त्यात ऋषिकेश हा लहान होता. त्याने टोकाचा निर्णय घेतल्याने आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. रुग्णालयात तर वडिलांनी प्रचंड आक्रोश केला.