मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी केंद्र सरकारवर पहलगाम हल्ल्यानंतर कोणतेही ठोस पाऊल न उचलण्याचा आरोप केला. हे सरकार पहलगा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा बदला घेणार नाही. ते केवळ विमाने व रणगाडे पळवून डिझेलची नासाडी करताना दिसून येत आहे, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकारणात खमंग चर्चा रंगली आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे गत 22 एप्रिल रोजी अतिरेकी हल्ला झाला होता. त्यात महाराष्ट्राच्या 6 जणांसह एकूण 26 पर्यटक मारले गेले होते. या घटनेनंतर भारत- पाकमध्ये युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी उपरोक्त दावा केला आहे. ते सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांनी फक्त एकदाच प्रयोग केला होता. त्यावेळी संपूर्ण जग हादरून गेले होते. त्यांना सर्वजण घाबरत होते. पण यांना (मोदी) कुणीच भीत नाही. ते तिकडे (पाकिस्तान) पाण्याची आणीबाणी झाली म्हणून दावा करतात. पण तिकडे तर पाणी सन्नाटपणे वाहत आहे. हे केवळ विमान, रणगाडे व फौजी लोक बसलेल्या गाड्या पळवताना दाखवतात.
विशेषतः हे व्हिडिओ आत्ताचे आहेत की यापूर्वीचे याचाही काही मेळ लागत नाही. केवळ युद्धजन्य परिस्थिती दाखवतात. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशीही परिस्थिती सारखीच असते. यामुळे पुन्हा – पुन्हा एकच व्हिडिओ दाखवतात असे वाटते. मोदी सरकार हे अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा दरारा निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे. हे सरकार पाकिस्तानवर बॉम्ब टाकत नाही. बॉम्ब केवळ गोदामात साठवून ठेवलेत. हे बॉम्ब ट्रकमध्ये भरून पाकिस्तानवर नेऊन टाकले पाहिजे. मनोज जरांगे यांनी यावेळी राज्य मंत्रिमंडळाच्या चौंडी येथे होणाऱ्या नियोजित बैठकीवरही भाष्य केले. सरकारने अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बैठकीचा निर्णय घेतला असेल तर चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी मराठा आरक्षणाचाही निर्णय घेतला पाहिजे. सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) समाविष्ट करण्याचाही निर्णय घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.