मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज मोठे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात विरोधक सरकारला धारेवर धरू शकतात, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? याकडे लक्ष लागले असताना आता राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी 2100 रुपये देण्याबाबत मोठे विधान केले आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे. तसेच लाडक्या बहिणी या 1500 रुपयांत खुश असल्याचेही ते म्हणालेत.
राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारावेळी दिले होते. महायुती सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार, असा प्रश्न विचारला जात होता. तेव्हा अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतात, असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले होते. 10 मार्च रोजी अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. मात्र या योजनेचा सन्मान निधी वाढवण्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. त्यानंतर आता नरहरी झिरवाळ 2100 रुपयांबाबत स्पष्ट बोलले आहेत.
लाडक्या बहिणींना 2100 ऐवजी 1500 रुपयेच मिळत आहेत. तेही नियमित मिळत नसल्याने लाडक्या बहिणी नाराज आहेत. असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत मंत्री नरहरी झिरवाळ यांना विचारला. यावर बोलताना लाडक्या बहिणी नाराज आहेत, हे आपण सांगत असता किंवा विरोधक सांगत असतात. पण सर्व बाजूंनी लाडक्या बहिणी खूश आहेत. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे कोणीही जाहीर केलेले नाही, असे मंत्री नरहरी झिरवाळ म्हणालेत.
विरोधकांनी आधी म्हटले की महायुती लाडक्या बहिणींना 1500 रुपये देणार नाही. कारण त्यांच्याकडे 1500 रुपये देण्याची ऐपत नाही अशी टीका केली होती. त्यानंतर त्यांनी म्हटले की 2100 रुपये देणार आणि मग 1500 रुपये दिले नाहीत तर 2100 कसे देणार? अशी टीका केली. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले तर आता 2100 रुपये देण्यावर विरोधक जोर देत आहेत. मात्र, असा काही प्रकार नाही. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देखील परिपूर्ण आहेत. लाडक्या बहिणी 1500 रुपयांमध्ये खूश आहेत, असे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे.