जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील शिरसोलीपासून जवळ असलेल्या शज्जनशाह बाबा दर्गा भागातील नायगाव धरणाच्या पाण्यात गुरुवारी दुपारी ४:३० वाजता तीन मुली बुडाल्याची घटना घडली. नातेवाइकांच्या प्रसंगावधानामुळे यातील दोन मुलींना वाचविण्यात यश आले. मात्र खुशी अरमान पटेल (वय १४, रा.फातेमानगर, जळगाव) या मुलीचा धरणात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फातेमानगरातील अरमान पटेल यांच्या मोठ्या मुलीचे म्हणजेच मयत खुशीच्या मोठ्या बहिणिचे लग्न १८ एप्रिल रोजी जळगावात पार पडले. या लग्नासाठी सर्व नातेवाईक घरी आले होते. लग्नाची धावपळ संपल्यामुळे पटेल कुटुंबीय शिरसोली भागातील शज्जनशाह बाबा यांच्या दर्याच्या ठिकाणी दर्शनासाठी गेले होते. या परिसरात असलेल्या नायगाव धरणात खुशी आपल्या मैत्रिणीसह खेळायला गेली. त्याच ठिकाणी खुशीचे नातेवाईक देखील होते.
धरणाच्या पाण्यात खेळत असताना अचानक तिघी मुलींचा पाय घसरल्याने त्या खोल पाण्यात गेल्या. हा प्रकार लक्ष्यात येताच मुजाहिद पटेल या युवकाने थेट पाण्यात उतरून आयशा पटेल (वय १२) व अलिझा पठाण (वय १३) या दोघं मुलींना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, खुशी खोल पाण्यात गेली, काही वेळानंतर तिला बाहेर काढले. तातडीने खुशीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याठिकाणी नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला होता. काही दिवसांपूर्वी अरमान पटेल यांच्या घरात मोठ्या मुलीच्या लग्नानिमित्त आनंदोत्सव होता, तर गुरुवारी मात्र पटेल कुंटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.



