चाळीसगाव : प्रतिनिधी
मुंबईहून भडगावकडे नवरदेवासह येणाऱ्या वऱ्हाडींच्या कारचे टायर फुटले आणि कार समोरून येणाऱ्या दुचाकीवर आदळली. या भीषण अपघातात उंबरखेड येथील एकजण जागीच ठार झाला. ही घटना देवळी (ता. चाळीसगाव) नजीक गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद पंडितराव पाटील (रा. आदर्शनगर चाळीसगाव) असे मृत इसमाचे नाव आहे. ते उंबरखेडच्या सर ससून डेव्हिड वसतिगृहात व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. मुंबईहून गिरड (ता. भडगाव) येथे हळदीसाठी जाणाऱ्या नवरदेवाच्या चारचाकी वाहनाचे (क्र. एम.एच. ४२बी. एन. ०२४८) चे टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार समोरून येणाऱ्या विनोद पाटील यांच्या दुचाकीवर धडकली. धडक इतकी जोरात होती की, दोन्ही गाड्यांचा चुराडा झाला. पाटील यांच्या डोक्याला व छातीला जबर मार लागला. त्यांना चाळीसगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दुपारी १२वाजता त्यांचा मृत्यू झाला.