जळगाव : प्रतिनिधी
शेत जमिनीला वारस लावण्यावरून वाद होऊन चाकू हल्ल्यातील जखमी तौफिक कय्यूम पिंजारी (वय ३२, रा. सदाशिव नगर, मेहरुण) यांचा उपचार सुरू असताना सोमवारी (दि. १४) मृत्यू झाला. तौफिक यांच्यावर ११ एप्रिल रोजी वार करण्यात आल्यानंतर त्यांच्या दोन्ही मेहुण्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, तौफिक पिंजारी व त्यांचे मेहुणे अस्लम समशोद्दीन पिंजारी व शफिक गफूर पिंजारी यांच्यामध्ये शेत जमिनीला वारस लावण्यावरून वाद झाले होते. ११ एप्रिल रोजी तौफिक यांच्या घरी जाऊन त्यांना दोन्ही मेहुण्यांनी मारहाण केली. अस्लम याने तरुणाच्या कमरेजवळ चाकूने वार केला होता. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पिंजारी यांच्या मृत्यूप्रकरणी आता खुनाचे कलम वाढले आहे. या प्रकरणात शफिक गफूर पिंजारी याला नशिराबाद ते जळगाव दरम्यान पोउनि राहुल तायडे, पोहेकों नितीन ठाकूर, नाना तायडे, गणेश ठाकरे, राहुल घेटे यांनी अटक केली. तर अस्लम समशोद्दीन पिंजारी हा न्यायालयात हजर झाला. तपास पोउनि अशोक काळे करीत आहेत.
११ एप्रिलपासून तौफिक यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. १३ एप्रिल रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्यांना तेथे नेले, मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचे सांगण्यात आले. याठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा १४ एप्रिल रोजी पहाटे मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.