यावल : प्रतिनिधी
तापी नदीवर अंघोळीसाठी गेलेला बालक, त्याची आई आणि मावशी अशा तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना अंजाळे ता. यावल येथे सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. या महिला गोंधळाच्या कार्यक्रमासाठी येथे आल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, नकुल सतीश भिल (५), त्याची आई वैशाली सतीश भिल (२८, रा. अंतुर्ली ता. अमळनेर) आणि मावशी सपना गोपाल सोनवणे (२७, रा. पळाशी, ता. सोयगाव) अशी मृतांची नावे आहेत. अंजाळे ता. यावल येथे घाणेकर नगरातील बादल लहू भिल यांच्याकडे रविवारी गोंधळाचा कार्यक्रम होता. यासाठी हे तिघे अंजाळे येथे आले होते. गोंधळाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी नकुल, त्याची आई वैशाली आणि सपना या अंघोळ व कपडे धुण्यासाठी तापी नदीवर गेल्या. त्यावेळी नकुल हा पाण्यात खेळत असतानाच गटांगळ्या खाऊ लागला. त्याची आई आणि सोबतची महिला या दोघी त्याला वाचविण्यास गेल्या. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तेथील डोहात त्याही बुडाल्या. यावल पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने सायंकाळच्या सुमारास तीनही जणांचे मृतदेह बाहेर काढले. तिथून यावल ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणण्यात आले. रात्री आठ वाजता मृतदेह नातेवाइकांकडे सोपवले.